किल्ला क्र. ७ पुरंदर ( Purandar )

 पुरंदर  

छत्रपती संभाजी महाराजांचे जन्म स्थान..... पुरंदर .... सह्याद्रीच्या दक्षिणोत्तर पसरलेल्या मूळ रांगेतून काही फाटे पूर्व दिशेकडे फुटले आहेत. त्यापैकी एका फाट्यावर सिंहगड आहे. तोच फाटा पूर्वेकडे अदमासे २४ किमी भुलेश्वर जवळ लोप पावतो. याच डोंगरांगेवर पुरंदर आणि वज्रगड वसलेले आहेत. कात्रज घाट किंवा बापदेव घाट किंवा दिवे घाट ओलांडून पुरंदरच्या पायथ्याशी जाता येते. 
किल्ल्याच्या चौफेर माच्या आहेत. किल्ला पुण्याच्या आग्नेय दिशेला अंदाजे २० मैलावर तर सासवडच्या नैऋत्येला ६ मैलावर आहे. गडाच्या पूर्वेला बहुतांशी प्रदेश सपाट आहेत. तर पश्चिमेला डोंगराळ प्रदेश आहे. वायव्येला १३-१४ मैलावर सिंहगड, तर पश्चिमेला १९-२० मैलावर राजगड आहे. 
पुरंदर किल्ला विस्ताराने मोठा आहे. किल्ला मजबूत असून बचावला जागा उत्तम आहे. गडावर मोठी शिबंदी राहू शकते. दारुगोळा व धान्याचा मोठा साठा करून गड दीर्घकाळ लढवला येऊ शकत असे. एक बाजू सोडली तर गडाच्या इतर सर्व बाजू दुर्गम आहेत. गडावरून सभोवारच्या प्रदेशावर बारीक नजर ठेवला येते.
अल्याड जेजुरी पल्याड सोनोरी मध्ये वाहते कऱ्हा पुरंदर शोभती शिवशाहीचा तुरा... 
पुरंदर म्हणजे इंद्र....  ज्याप्रमाणे इंद्राचे स्थान बलाढ्य तसाच हा पुरंदर. पुराणात डोंगराचे नाव आहे 'इंद्रनील पर्वत' हनुमंताने द्रोणागिरी उचलून नेती  असताना त्या पर्वताचा काही भाग खाली पडला तोच हा इंद्रनील पर्वत. बहामनीकाळी बिदरचे चंद्रसंपत देशपांडे यांनी बहामनी शासनाच्या वतीने पुरंदर ताब्यात घेतला. त्यानी पुरंदरच्या पुनर्निर्माणास प्रारंभ केला. त्यात घराण्यातील महादजी निळकंठ याने कसोशीने हे काम पूर्ण केले.
हा किल्ला सन १४८९च्या सुमारास निजामशाही सरदार मलिक अहमद याने जिंकून घेतला. पुढे शके १५५० मध्ये तो आदिलशाहीत आला. इ.स. १६४९ मध्ये आदिलशहाने शहाजीराजांना कैदेत टाकले. त्याच वेळी शिवाजी महाराजांनी अनेक आदिलशाही किल्ले आपल्या ताब्यात घेतले. म्हणून शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने फत्तेखानास रवाना केले. परिस्थिती फारच बिकट होती. एकीकडे आपले वडील कैदेत होते. तर दुसरीकडे फत्तेखानाच्या स्वारीमुळे स्वराज्य धोक्यात येणार होते. महाराजांनी यावेळी लढाईसाठी पुरंदर किल्ल्याची जागा निवडली. मात्र यावेळी गड मराठ्यांच्या ताब्यात नव्हता. महादजी निळकंठराव यांच्या ताब्यात किल्ला होता. त्यांच्या भावाभावांमधील भांडणाचा फायदा उठवून महाराजांनी किल्ल्यात प्रवेश करण्यात यश मिळवले. या पुरंदर किल्ल्याच्या साहाय्याने मराठ्यांनी फत्तेखानाशी झुंज दिली आणि लढाई जिंकली. शिवाजी महाराजांना या पहिल्या लढाईतच मोठे यश प्राप्त झाले. सन १६५५ मध्ये शिवाजीराजांनी नेताजी पालकर यास गडाचा सरनौबत नेमले. वैशाख शु. १२ शके १५७९ म्हणजेच १४ मे १६५७ या दिवजी संभाजी राजांचा जन्म पुरंदरवर झाला.

१६६५ मध्ये मोगल सरदार जयसिंगाने पुरंदरला वेढा घातला. खानाने वज्रगड ताब्यात घेतला आणि पुरंदरवर हल्ला केला व पुरंदर माचीच ताबा घेतला. माचीवर खानाचे आणि मुरारबाजीचे घनघोर युद्ध झाले. मुरारबाजी पडला आणि त्याच बरोबर पुरंदरही पडला. हे वर्तमान जेव्हा राजांना कळले तेव्हा त्यांनी जयसिंगाशी तहाचे बोलणे सुरु केले आणि ११ जून १६६५ साली 'पुरंदरचा तह' झाला. यात २३ किल्ले राजांना मोगलांना द्यावे लागले. यात पुरंदर, रुद्रमाळ, कोंढाणा, रोहिडा, लोहगड,विसापूर,तुंग, तिकोना, प्रबळगड, माहुली, मनरंजन, कोहोज, कर्नाळा, सोनगड, पळसगड, भंडारगड, नरदुर्ग, मार्गगड, वसंतगड, नंगगड , अंकोला, खिरदुर्ग,मानगड, अशी या किल्ल्यांची नावे आहेत.
 ८ मार्च १६७० मध्ये निलोपंत मुजुमदाराने किल्ला स्वराज्यात आणला. संभाजी राजांच्या मृत्यूनंतर किल्ला औरंगजेबाने जिंकला व त्याचे नाव ' आजमगड ' ठेवले. पुढे मराठ्यांच्या वतीने शंकराजी नारायण सचिवांनी मोगलांशी भांडून पुरंदर घेतला. शके १६९५ मध्ये छत्रपती शाहू यांनी किल्ला पेशवे यास दिला. अनेक दिवस किल्ल्यावर पेशव्यांची राजधानी होती. इ.स. १८१८ मध्ये इंग्रजांनी गड आपल्या ताब्यात घेतला. 
बिनी दरवजा - पुरंदर माचीवरील हा एकमेव दरवाजा नारायणपूर गावातून किल्ल्यावर जाताना हा दरवाजा लागतो. दरवाज्यातून आत शिरल्यावर पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत. समोरच पुरंदरचा खंदकडा आपले लक्ष वेधून घेतो. आपण सरळ रस्त्याने पुढे गेल्यावर उतारावर लष्करच्या बराकी आणि काही बंगले दिसतात. थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी एक मंदिर दिसते. त्याचे नाव पुरंदरेश्वर आहे.
 पुरंदरेश्वर मंदिर- हे मंदिर महादेवाचे आहे. मंदिरात इंद्राची सव्वा ते दीड फूट उंचीची मूर्ती आहे. हे साधारणपणे हेमाडपंती धाटणीचे असावे. थोरल्या बाजीरावाने या मंदिराचा जीर्णोद्धार केला.
रामेश्वर मंदिर- पुरंदरेश्वर मंदिराच्या मागील कोपऱ्यात पेशवे घराण्याचे रामेश्वर मंदिर आहे. हे पेशव्यांचे खाजगी मंदिर होते. या मंदिरापासून थोडे वरती गेल्यावर पेशव्याच्या दुमजली दांड्याचे अवशेष दिसतात. पेशवाईच्या आरंभी बाळाजी विश्वनाथने तो वाडा बांधलं होता. या वाड्याच्या मागे विहीर आहे. येथून थोडे पुढे गेल्यावर दोन वाट लागतात. एक वाट बालेकिल्ल्याच्या दिशेने वर जाते तर दुसरी खाली भैरवखिंडीच्या दिशेने जाते. बालेकिल्ल्याच्या दिशेने वर गेल्यावर दिल्ली दरवाजा लागतो. 

दिल्ली दरवाजा-  हा उत्तराभिमुख दरवाजा आहे. दरवाज्यच्या वळणावर श्री लक्ष्मी मातेचे देवालय आहे. आत गेल्यावर उजवीकडे आणखी एक दरवाजा दिसतो. डावीकडे वाट बालेकिल्ल्याच्या दुसऱ्या टोकापर्यंत जाते. या वाटेने पुढे गेल्यावर काही पाण्याची टाकी लागतात.
खंदकडा- दिल्ली दरवाज्यातून आत शिरल्यावर डावीकडे एक कडा थेट पूर्वेकडे गेलेला दिसतो. हाच तो खंदकडा. या कड्याच्या शेवटी एक बुरुज आहे. बुरुज पाहून परत दरवाज्यापाशी यावे. येथून एक वाट पुढे जाते. या वाटेतच आजूबाजूला पाण्याची काही टाकी लागतात. थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे एक उंचवटा लागतो. त्याच्या मागे पडक्या जोत्यांचे अवशेष आहेत. येथेच अंबरखाण्याचे अवशेष दिसतात. थोडे वर चढून पाहिल्यास वाड्याचे अदशेष दिसतात. वाटेवर पुढे गेल्यावर काही पाण्याची हौद लागतात. या  पुढे जाताना एक वाट   या वाटेने गेल्यावर  केदार दरवाजा लागतो. 
पद्मावती तळे- मुरारबाजींच्या पुतळ्याच्या पुढे गेल्यावर पद्मावती तळे लागते. 
शेंदऱ्या बुरुज- पद्मावती तळ्याच्या मागे बालेकिल्ल्याच्या वायव्येस तटबंदीच्या बरोबरीने एक बुरुज बांधला आहे. त्याला शेंदर्या बुरुज म्हणतात. 
केदारेश्वर मंदिर- केदार दरवाजा पाहून मूळ वाटेने चालून गेल्यावर काही पायऱ्या लागतात. त्या आपल्याला थेट केदारेश्वर मंदिरापर्यंत घेऊन जातात. पुरंदरचे मूळ दैवत म्हणजे केदारेश्वर. मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे. महाशिवरात्रीला हजारो भाविक येथे दर्शनाला येतात. मंदिराच्या समोरच एक दगडी दीपमाळ आहे. सभोवती दगडी फरसबंदी आहे. केदारेश्वराचे मंदिर म्हणजे किल्ल्यावरील अतुलनीय भाग. येथून राजगड, तोरणा, सिंहगड, रायरेश्वर, रोहिडा, मल्हारगड, कऱ्हेपठार हा सर्व परिसर दिसतो. या केदार  टेकडीच्या मागे एक बुरुज आहे त्याला कोकण्या बुरुज म्हणतात. 
पुरंदर माची- आल्या वाटेनं माघारी फिरून दिल्ली दरवाज्यातून जाणाऱ्या वाटेने थेट पुढे यावे म्हणजे आपण माचीवरील भैरवखिंडीच्या जाऊन पोहोचतो. वाटेत वाड्याचे अनेक अवशेष दिसतात. 
भैरवगड- याच खिंडीतून वज्रगडावर जाण्यासाठी वाट आहे. खिंडीत शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. या खिंडीपर्यंत गाडी रस्ता आलेला असल्याने त्या रस्त्यावरून गेल्यावर वाटेतच उजवीकडे राजाळे तलाव लागतो. पुरंदर माचीवर याच तलावाचे पाणी वापरले जाते. 
वीर मुरारबाजी- बिनी दरवाज्यातून आत शिरल्यावर उजवीकडे गेल्यावर समोरच मुरारबाजींचा पुतळा दिसतो. इ.स. १९७० मध्ये हा पुतळा युद्ध केला आहे. 
पुण्याहून सासवड मार्गे नारायणपूर या गावी यावे. नारायणपूर हे गाव किल्ल्याच्या पायथ्याशी आहे. गावातून गाडीरस्ता थेट किल्ल्यापर्यंत गेलेला आहे. नारायणपूर गावातून गडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक म्हणजे गाडीरस्ता. या रस्त्याने चालतचालत गाद गाठण्यास २ तास लागतात. तर दुसरी म्हणजे जंगलातून जाणारी पायवाट. या वाटेने एका तासात माणूस पुरंदर माचीच्या बिनीदरवाज्यापाशी पोहोचतो. 
धन्यवाद.... 

Comments